Pune news : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या खडकवासला, धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नांदेड आणि सणसवाडी या गावांसाठी पाणीपुरवठा योजनांसाठी ५६२ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची मागणी महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे. या भागात दूषित पाण्यामुळे गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) आजाराचे रुग्ण आढळल्याने जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पाण्याच्या टाक्यांची नितांत गरज भासली आहे.
महापालिकेच्या अहवालानुसार, सध्या या गावांना सुमारे ३० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यातील २८ एमएलडी पाणी हे रॉ-वॉटर स्वरूपात असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. २०२४ मध्ये या गावांची लोकसंख्या १.७८ लाख असून, २०५२ पर्यंत ती ४.२७ लाखांपर्यंत पोहोचेल. त्यानुसार, भविष्यातील पाण्याची गरज ८९ एमएलडी होणार आहे.
यासाठी पुणे महापालिकेने या गावांसाठी स्वतंत्र समान पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यात खडकवासला येथे नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून, २९ पाण्याच्या टाक्यांची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ५६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या कमकुवत असल्याने या प्रकल्पासाठी ५१५ कोटी रुपयांचा निधी आणि ११ एकर भूसंपादनासाठी ४७ कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. प्रशासनाच्या मते, हा निधी लवकर उपलब्ध झाल्यास या भागातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करता येईल आणि भविष्यातील पाणीटंचाईची समस्या सुटण्यास मदत होईल.