यवत (पुणे) – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर माती आणि खडी साचल्याने अपघातांचा धोका वाढला असून वाहनचालक आणि नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी दुचाकी मार्गावर माती आणि खडी पसरली असून त्यामुळे वाहनचालकांना ब्रेक दाबावे लागत आहेत, परिणामी अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे.
महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, कासुर्डी टोल नाका ते पाटस हद्दीतील विविध ठिकाणी दुचाकी मार्गावर माती आणि खडी साचली आहे. अचानक समोर माती किंवा खडी आल्याने गाडी घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने हे अडथळे तातडीने दूर करावेत, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.
भुयारी मार्गाच्या दुरवस्थेवरही नागरिकांची नाराजी
यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिराजवळील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे, तसेच तिथले दिवे बंद असल्याने वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. पुलावर पडलेले सिमेंट आणि मोठ्या खड्ड्यांमुळे देखील प्रवाशांना त्रास होत आहे.
यात्रेसाठी मार्ग सुस्थितीत करण्याची गरज
लवकरच श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी मातेची यात्रा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील भुयारी मार्ग तातडीने सुरू करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ग्रामपंचायतीने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि महामार्ग प्रशासनाने तातडीने रस्त्याची डागडुजी करावी, अशीही नागरिकांची मागणी आहे.
महामार्ग प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष?
ग्रामसभेत महामार्ग प्रशासनाच्या समस्यांवर ठराव मांडण्यात आला होता. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही परिस्थितीत काहीही सुधारणा झालेली नाही. महामार्ग प्रशासन आणि ग्रामपंचायत याबाबत कधी कार्यवाही करणार? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा
रस्त्यावरील माती आणि खडी वेळेत न हटवल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने तातडीने हे अडथळे दूर करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी. अन्यथा वाहनचालक आणि स्थानिक नागरिक आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
Risk of accidents increased on Pune-Solapur highway; Citizens demand urgent measures