Pune News – RBI bank News रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुण्यातील न्यू इंडिया सहकारी बँकेवर आर्थिक निर्बंध लादले असून, यामुळे हजारो खातेदार संकटात सापडले आहेत. मुंबई आणि पुण्यासह अनेक शहरांमध्ये सभासद असलेल्या या बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर तीन महिने निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
बँकेच्या बिबवेवाडी शाखेत सकाळपासून खातेदारांची गर्दी झाली असून, अनेक जण आपल्या ठेवींच्या सुरक्षिततेबाबत विचारणा करत आहेत. काहींनी घरखर्चासाठी, तर काहींनी उद्योग-व्यवसायासाठी बँकेत पैसे ठेवले होते. मात्र, व्यवहार बंद झाल्याने हे पैसे मिळणार की नाही, याची शंका सर्वसामान्य खातेदारांना सतावू लागली आहे.
ठेवीदारांची मोठी अडचण
जयश्री सौदडे, बिबवेवाडी येथील रहिवासी, या घरकाम करून पैसे साठवत होत्या. त्यांचे एक लाख रुपये बँकेत जमा होते, पण निर्बंधामुळे त्यांचे भवितव्य अंधारात आहे. त्याचप्रमाणे कोंढवा येथे केटरिंग व्यवसाय करणारे कमलेश माळी यांनीही चार लाखांहून अधिक रक्कम बँकेत ठेवली होती. आता कामगारांचे पगार आणि व्यवसायाचे व्यवहार कसे करायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
बँकेच्या भविष्याबाबत चिंता
सभासदांना त्यांच्या ठेवींचे काय होणार याची स्पष्टता मिळत नसल्याने अनेकजण नाराज आहेत. बँक बंद पडण्याच्या भीतीने लोकांमध्ये अस्वस्थता आहे. आरबीआयच्या या कारवाईनंतर बँकेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यातील स्थिती काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.